शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. त्याचबरोबर शेती करण्यासाठी प्रथम गरज लागते ती पाण्याची. कारण पाण्याशिवाय शेत करणे शक्यच नाही. त्यामुळे शेतीसाठी (Agriculture) पाण्याचा मुबलक साठा गरजेचा असतो. तसेच शेताला पाणी देण्यासाठी सिंचन व्यवस्था देखील महत्वाची असते. यासाठीच सरकारने ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ सुरू केली आहे. चला तर मग या योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पंतप्रधान कृषी सिंचन योजना | PM Krishi Sinchai Yojana
‘पंतप्रधान कृषी सिंचन योजनें’तर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होतो. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत 55 टक्के अनुदान मिळते. तसेच इतर शेतकऱ्यांना 5 हेक्टरच्या मर्यादेत 45 टक्के अनुदान देण्यात येते. त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. आता योजनेबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
कृषी सिंचन योजनेसाठी 500 कोटींच्या निधीस मान्यता
राज्य सरकारच्या 29 जून 2022 रोजी घेतलेल्या शासन निर्णयात पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत वैयक्तित शेततळ्याचा समावेश करण्यात आला होता. नुकताच आता मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 2025- 2026 या आर्थिक वर्षासाठी 500 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी 500 कोटींच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अनुदान
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेसाठी देण्यात आलेला निधीपैकी 400 कोटी ठिबक आणि तुषार सिंचनासाठी देण्यात आले आहेत. तर 100 कोटी रुपये वैयक्तिक शेततळ्यासाठी देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ महाडीबीटीद्वारे मिळणं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम त्यांच्या सक्रिय असलेल्या आधार संलग्न बँक खात्यात हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना सिंचनासाठी या योजनेचा फायदा होणार आहे.